समतेचा लढा स्वाध्याय

समतेचा लढा स्वाध्याय

समतेचा लढा स्वाध्याय इयत्ता आठवी इतिहास

प्रश्न. 1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.

(लाला लजपतराय, साने गुरुजी, रखमाबाई जनार्दन सावे)

1) राजकोट येथे रेडक्रॉस सोसायटीची स्थापना ………………….. यांनी केली.

उत्तर :

राजकोट येथे रेडक्रॉस सोसायटीची स्थापना रखमाबाई जनार्दन सावे यांनी केली.

2) अंमळनेरच्या गिरणी कामगार युनियनचे अध्यक्ष …………………. हे होते.

उत्तर :

अंमळनेरच्या गिरणी कामगार युनियनचे अध्यक्ष साने गुरुजी हे होते.

3) आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष ………………….. होते.

उत्तर :

आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष लाला लजपतराय होते.

प्रश्न. 2. टिपा लिहा.

1) महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे सामाजिक कार्य

उत्तर :

विठ्ठल रामजी शिंदे दलितांच्या प्रगतीसाठी 1906 मध्ये डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था सुरू केली. दलितांना स्वाभिमानी, सुशिक्षित व उद्योगी करणे हा त्यांच्या कार्याचा महत्त्वाचा भाग होता. उच्चवर्णीयांच्या मनातील दलिताविषयक भ्रामक समजूत नष्ट करणे हा दुसरा भाग होता. पुणे येथे पर्वती मंदिरात प्रवेश, सत्याग्रह, दलितांची शेतकी परिषद, संयुक्त मतदारसंघ योजना इत्यादीबाबत दलितवर्गाच्या हिताच्या दृष्टीने त्यांनी काम केले. मुंबईत परळ, देवनार या भागात मराठी व उद्योगशाळा काढल्या.

2) राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात केलेल्या सुधारणा

उत्तर :

राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात आरक्षणाचा जाहीरनामा काढला. मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला. रोटीबंदी, बेटीबंदी आणि व्यवसायबंदी अशा निर्बधाला मूठमाती दिली.

सभा परिषदांमधून दलित लोकांच्या हातचे अन्न घेऊन रोटीबंदी झुगारली. आपल्या संस्थानात आंतरजातीय विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा कायदा मंजूर केला.

22 फेब्रुवारी 1918 रोजी संस्थानातील बलुतेदारी पद्धती नष्ट करण्यात आली. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाची पाठराखण केली.

प्रश्न. 3. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

1) सरकारने साम्यवादी चळवळ चिरडण्याचे ठरवले.

उत्तर :

कार्ल मार्क्स आणि त्याचा साम्यवाद यांचा परिचय भारतीयांना होऊ लागला होता. मानवेंद्रनाथ राॅय यांचा आंतरराष्ट्रीय साम्यवादी चळवळीत सक्रिय सहभाग होता.

1925 साली भारतात साम्यवादी पक्षाची स्थापना झाली. कामगारांच्या व शेतकऱ्यांच्या लढाऊ संघटना उभारण्याचे कार्य साम्यवादी तरुणांनी केले. सरकारने ही चळवळ चिरडण्याचे ठरवले. श्रीपाद अमृत डांगे, मुझफ्फर अहमद, केशव नीळकंठ जोगळेकर इत्यादी नेत्यांना पकडण्यात आले. ब्रिटिश राज्य उलथून टाकण्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. त्यांना वेगवेगळ्या शिक्षा करण्यात आल्या.

2) बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक, बहिष्कृत भारत यांसारखी वृत्तपत्रे सुरू केली.

उत्तर :

वृत्तपत्रे ही बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे अविभाज्य अंग होते. समाजात जागृती निर्माण करण्यासाठी आणि दु:खाला वाचा फोडण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, समता ही वृत्तपत्रे सुरू केली.

3) राष्ट्रव्यापी कामगार संघटनेची आवश्यकता भासू लागली.

उत्तर :

पहिल्या महायुद्धानंतर भारतात औद्योगिकीकरणामुळे कामगारवर्गाची वाढ झाली. कापड गिरण्या, रेल्वे कंपन्या इ. उद्योगात काम करणाऱ्या कामगारांच्या संघटना आपआपले प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील होत्या, पण त्यात एकत्रित अशी संघटना शक्ती नव्हती. तेव्हा राष्ट्रव्यापी कामगार संघटनेची आवश्यकता वाटू लागली.

प्रश्न. 4. पुढील प्रश्नांची उत्तरे थोडक्यात लिहा.

1) आधुनिक भारताच्या जडणघडणीत समतेचा लढा महत्त्वाचा का ठरतो ?

उत्तर :

आधुनिक भारताच्या जडणघडणीत राजकीय स्वातंत्र्याचा लढा महत्त्वाचा होता. हा लढा मानवमुक्तीच्या व्यापक तत्त्वज्ञानावर आधारलेला होता. त्यामुळे या लढ्याच्या बरोबरच सरंजामशाही, सामाजिक विषमता, आर्थिक शोषण या गोष्टींना विरोध होऊ लागला. स्वातंत्र्याप्रमाणेच समतेचे तत्त्वही महत्त्वाचे वाटू लागल्याने शेतकरी, दलित, स्त्रिया, कामगार यांनी उभारलेल्या चळवळी आणि समतेला महत्त्व देणारा समाजवादाचा प्रवाह यांचे आधुनिक भारताच्या जडणघडणीत फार मोठे योगदान आहे. म्हणून भारताच्या जडणघडणीत समतेचा लढा महत्त्वाचा ठरतो.

2) पूर्व खानदेशात साने गुरुजींनी केलेले कार्य लिहा.

उत्तर :

1938 साली पूर्व खानदेशात अतिवृष्टी होऊन पीक बुडाले. शेतकऱ्यांची स्थिती हलाखीची झाली. शेतकऱ्यांना शेतसारा माफ करून घेण्यासाठी साने गुरुजींनी जागोजागी सभा, मिरवणुका घेतल्या. कलेक्टर कचेरीवर मोर्चे काढले. 1942 च्या क्रांतीत मोठ्या प्रमाणावर शेतकरी सामील झाले.

साने गुरुजींनी कामगारांची एकजूट बांधली. धुळे-अंमळनेर ही कामगार संघटनांची प्रबळ केंद्र बनविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अंमळनेरच्या गिरणी कामगार युनियनचे ते अध्यक्ष होते. अशा प्रकारे साने गुरुजींनी पूर्व खानदेशात कार्य केले.

3) कामगारांनी उभे केलेले लढे राष्ट्रीय चळवळीला पूरक कसे ठरले.

उत्तर :

पहिल्या महायुद्धानंतर भारतात औद्योगिकीकरणामुळे कामगारवर्गाची वाढ झाली. तेव्हा राष्ट्रव्यापी कामगार संघटनेची आवश्यकता वाटू लागली. यातून 1920 साली आयटकची स्थापना झाली.

लाला लजपतराय यांनी आयटकच्या पहिल्या अधिवेशनात कामगारांनी राष्ट्रीय चळवळीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे सांगितले. श्रीपाद अमृत डांगे, मुझफ्फर अहमद इ. समाजवादी नेत्यांनी कामगारांच्या लढाऊ संघटना उभारल्या. 1928 साली मुंबईतील गिरणी कामगारांनी 6 महिने संप केला. असे अनेक संप रेल्वे कामगार, ताग कामगारांनी केले. कामगार चळवळीची वाढती व्याप्ती व शक्ती पाहून सरकार अस्वस्थ झाले. ही चळवळ दडपण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले.अशा प्रकारे कामगारांनी केलेले लढे राष्ट्रीय चळवळीला पूरक ठरले.

4) स्त्रीविषयक सुधारणा चळवळीचे स्वरूप स्पष्ट करा.

उत्तर :

भारतीय समाजव्यवस्थेत स्त्रियांना दुय्यम स्थान होते. अनेक दृष्ट चालिरीतींमुळे त्यांच्यावर अन्याय होत होता; परंतु आधुनिक युगात या विरुद्ध जागृती होऊ लागली. स्त्रीविषयक या सुधारणा चळवळीत काही पुरुषांनी पुढाकार घेतला. काळाच्या ओघात स्त्रियांचे नेतृत्व पुढे आले.

पंडिता रमाबाई यांनी ‘आर्य महिला समाज’ व ‘शारदासदन’ या संस्था स्थापन केल्या.

1904 मध्ये भारत महिला परिषद व 1927 मध्ये ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्स या संस्थांची स्थापना झाली. त्यामुळे हे कार्य राष्ट्रीय पातळीवर जाऊन पोहोचले. वारसा हक्क, मतदानाचा हक्क इ. प्रश्नांबाबत स्त्रिया संघर्ष करू लागल्या. रखमाबाई सावे या वैद्यकिय सेवा देणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर. त्यांनी स्त्रियांसाठी आरोग्यविषयक व्याख्यानमाला चालवल्या.

राजकोट येथे त्यांनी रेडक्रॉस सोसायटीची स्थापना केली. 1935 च्या कायद्यानंतर प्रांतिक मंत्रीमंडळात स्त्रियांचा समावेश झाला. स्वातंत्र्यानंतर स्त्री-पुरुष समानतेचे तत्त्व संविधानात स्पष्टपणे नमूद करण्यात आले.

1 thought on “समतेचा लढा स्वाध्याय”

Leave a Comment