आर्थिक विकास स्वाध्याय इयत्ता नववी इतिहास

1. अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
1) १९ जुलै १९६९ साली देशातील प्रमुख ……………….. बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
अ) १२
ब) १४
क) १६
ड) १८
उत्तर :
१९ जुलै १९६९ साली देशातील प्रमुख १४ बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
2) वीस कलमी कार्यक्रमाची …………………. यांनी घोषणा केली.
अ) पं. नेहरू
ब) लालबहादूर शास्त्री
क) इंदिरा गांधी
ड) पी. व्ही. नरसिंहराव
उत्तर :
वीस कलमी कार्यक्रमाची इंदिरा गांधी यांनी घोषणा केली.
ब) पुढील चुकीची जोडी ओळखून लिहा.
1) कावसजी दावर – पोलादाचा कारखाना
2) डॉ. दत्ता सामंत – गिरणी कामगारांचे नेतृत्व
3) ना. मे. लोखंडे – गिरणी कामगारांना सुट्टी
4) नारायण सुर्वे – कवितांद्वारे श्रमिकांच्या जीवनाचे दर्शन
उत्तर :
चुकीची जोडी : कावसजी दावर – पोलादाचा कारखाना
2. अ) दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा.
पुढील तक्ता पूर्ण करा.
| पंचवार्षिक योजना | कालावधी | उद्दिष्ट्ये |
|---|---|---|
| पहिली | …………….. | शेती, सामाजिक विकास |
| दुसरी | १९५६-१९६१ | औद्योगिकीकरण |
| तिसरी | …………….. | विषमतेचे निर्मूलन, रोजगार संधी विस्तार, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ |
| …………….. | १९६९-१९७४ | शास्त्रीय संशोधन, आरोग्य व कुटुंबनियोजन ……… |
| पाचवी | …………….. | …………….. |
उत्तर :
| पंचवार्षिक योजना | कालावधी | उद्दिष्ट्ये |
|---|---|---|
| पहिली | १९५१-१९५६ | शेती, सामाजिक विकास |
| दुसरी | १९५६-१९६१ | औद्योगिकीकरण |
| तिसरी | १९६१-१९६६ | विषमतेचे निर्मूलन, रोजगार संधी विस्तार, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ |
| चौथी | १९६९-१९७४ | शास्त्रीय संशोधन, आरोग्य व कुटुंबनियोजन |
| पाचवी | १९७४-१९७९ | दारिद्र्यनिर्मूलन, आर्थिकदृष्ट्या देश स्वावलंबी बनवणे |
ब) टीपा लिहा.
1) मिश्र अर्थव्यवस्था
उत्तर :
i) ज्या अर्थव्यवस्थेत काही उद्योग खासगी उद्योजकांच्या मालकीचे असतात, तर काही उद्योग सरकारी मालकीचे असतात: अशा अर्थव्यवस्थेस ‘मिश्र अर्थव्यवस्था’ असे म्हणतात.
ii) मिश्र अर्थव्यवस्थेत भांडवलशाही व समाजवादी अर्थव्यवस्थांतील चांगले गुण एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला असतो.
iii) या अर्थव्यवस्थेत उद्योगातील नफ्याची प्रेरणा, नियमपालन, कालबद्ध नियोजन इत्यादी गोष्टींचा विचार केलेला असतो.
iv) भारत स्वतंत्र झाल्यावर आर्थिक विकास साधण्यासाठी भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचाच स्वीकार केला.
2) वीस कलमी कार्यक्रम
उत्तर :
१ जुलै १९७५ रोजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी वीस कलमी कार्यक्रमाची घोषणा करून विकसित राष्ट्राच्या दिशेने वेगवान वाटचाल करण्याच्या प्रयत्नांचा संकल्प सोडला. यातील प्रमुख तरतुदी पुढीलप्रमाणे आहेत.
i) शेती आणि शहरी भागातील कमाल जमीन धारणा, संपत्तीची समान वाटणी, शेतमजुरांना किमान वेतन, जलसंधारण योजनांत वाढ करणे.
ii) कामगारांचा उद्योगक्षेत्रात सहभाग, राष्ट्रीय प्रशिक्षण योजना आणि वेठबिगार मुक्ती करणे.
iii) करचुकवेगिरी, आर्थिक गुन्हे व तस्करी रोखणे.
iv) जीवनावश्यक वस्तूंचे दरनियंत्रण, रेशनिंग व्यवस्थेत सुधारणा करणे.
v) हातमाग क्षेत्र विकासाद्वारे, उत्तम वस्त्रोद्योग निर्मिती, दुर्बल घटकांची कर्जमुक्ती, घरबांधणी, दळणवळण सुविधा, शाळांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे.
3. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
1) स्वतंत्र भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला.
उत्तर :
कारण – i) भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खासगी मालकीची असतात.
ii) तर समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने समाजाच्या म्हणजेच शासनाच्या मालकीची असतात.
iii) परंतु मिश्र अर्थव्यवस्था ही खासगी आणि सामाजिक अशा दोन्ही क्षेत्रांत कार्य करते.
iv) आधुनिक भारताचा आर्थिक विकास साधण्यासाठी दोन्ही अर्थव्यवस्थांपेक्षा ‘मिश्र अर्थव्यवस्था’ ही सर्वांधिक योग्य अर्थव्यवस्था ठरली. त्यामुळे स्वतंत्र भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला.
2) १९६९ मध्ये बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
उत्तर :
कारण – i) भारताने मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली होती.
ii) राष्ट्रीयीकरणाचा निर्णय घेतल्यानंतर देशाला उद्देशून केलेल्या आकाशवाणीवरील भाषणात पंतप्रधानांनी सांगितले की, आपली उद्दिष्ट्ये लवकर साध्य करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
iii) आतापर्यंत बँक कर्जासाठी प्राथमिकता प्राप्त क्षेत्र काहीसे दुर्लक्षित राहिले आहे. शेती, लघु उद्योग तसेच निर्यात यांना पुरेसा कर्जपुरवठा व्हावा, बँकांवरील मोजक्या लोकांचे नियंत्रण रद्द व्हावे, बँकांच्या व्यवस्थापनाला व्यवसायिकतेची जोड मिळावी, नवीन उद्योजक वर्गाला प्रोत्साहन द्यावे, बँक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण मिळावे. तसेच त्यांच्या नोकरीच्या शर्ती चांगल्या असाव्यात. यासाठी १९६९ मध्ये बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
3) गिरणी कामगार संपावर गेले.
उत्तर :
कारण – i) १९८१ च्या दिवाळीत कामगारांना २०% बोनसची अपेक्षा होती.
ii ) कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रीय मिल मजदूर संघाने मालकवर्गाशी वाटाघाटी करून, कामगार वर्गाला विश्वासात न घेता ८ ते १७% वर तडजोड केली.
iii) बोनसमधील कपात ही असंतोषाची ठिणगी ठरली. काही कामगार डॉ. दत्ता सामंत यांच्याकडे गेले. त्यांनी डॉक्टरांना नेतृत्व स्वीकारण्याची विनंती केली.
iv) ६५ गिरण्यांमधील कामगार एकत्र आले आणि त्याचे नेतृत्त्व दत्ता सामंत करू लागते. त्यामुळे गिरणी कामगार संपावर गेले.
4. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.
1) आठव्या पंचवार्षिक योजनेत कोणते कार्यक्रम सुरू करण्यात आले ?
उत्तर :
आठव्या पंचवार्षिक योजनेत पुढील कार्यक्रम सुरू करण्यात आले.
i) प्रधानमंत्री रोजगार योजना.
ii) महिला समृद्धी योजना.
iii) राष्ट्रीय सामाजिक, आर्थिक साहाय्य योजना.
iv) मध्यान्ह आहार योजना.
v) इंदिरा महिला योजना.
vi) गंगा कल्याण योजना.
2) दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणते प्रकल्प सुरू करण्यात आले ?
उत्तर :
दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत पुढील प्रकल्प सुरू करण्यात आले.
i) दुर्गापूर, भिलाई, राऊरकेला येथील पोलादाचे कारखाने, सिंद्री येथील रासायनिक खतांचा कारखाना, चित्तरंजन येथील रेल्वे इंजिनाचा कारखाना, पेरांबुरचा आगगाडीच्या डब्यांचा कारखाना, विशाखापट्टणमचा जहाज बांधणीचा कारखाना इत्यादी प्रचंड व अवजड उद्योगधंद्याचे कारखाने सार्वजनिक क्षेत्रात उभारण्यात आले.
ii) शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी भाक्रा-नांगल, दामोदर यांसारखी प्रचंड धरणे उभारण्यात आली.