क्षेत्रभेट स्वाध्याय इयत्ता दहावी

क्षेत्रभेट स्वाध्याय इयत्ता दहावी

क्षेत्रभेट स्वाध्याय इयत्ता दहावी भूगोल

थोडक्यात उत्तरे द्या.

अ) तुम्ही केलेल्या क्षेत्रभेटीचा अहवाल तयार करा.

उत्तर :

क्षेत्रभेटीसाठी आम्ही गोदावरी नदी या क्षेत्राची निवड केली. क्षेत्रभेटीसाठी ठरलेल्या दिवशी आम्ही नागपूरही नाशिकला जाण्यासाठी सकाळी 9.00 च्या सुमारास निघालो. तिथे प्रत्यक्षात भेट देऊन तेथील परिसर बारकाईने न्याहाळला व स्थानिक परिसरातील लोकांकडून माहिती मिळविली. या क्षेत्रभेटीचा अहवाल पुढीलप्रमाणे आहे.

गोदावरी नदी – गोदावरी नदीची गणना भारतातील प्रमुख नद्यांमध्ये केली जाते. या नदीला ‘दक्षिण गंगा’ असेही म्हटले जाते. गोदावरी नदीची लांबी 1,450 किलोमीटर (900 मैल) आहे. गोदावरीचा उगम नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यात झाला आहे. साधारणतः आग्नेय दिशेला वाहून गोदावरी राजमहेंद्रीजवळ बंगालच्या उपसागरास मिळते. भीमा, वैनगंगा इ. उपनद्या असलेल्या गोदावरीचे राजमहेंद्री पासून 10 किमी अंतरावर व समुद्रापासून 80 किमी आधी समुद्रास मिळण्यापूर्वी दोन उपवाहिन्यांमध्ये विभाजन होते. त्यांना गौतमी नदी आणि वसिष्ठा नदी असे म्हणतात.

गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ 3,19,810 असून या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्य प्रदेश, ओरिसा या राज्यांचा समावेश आहे. या नदीच्या उगमस्थानाची उंची 1,620 मी. (5,310 फूट) इतकी असून सरासरी प्रवाह 3,505 घन मी./से (1,23,800 घन फूट/से.) आहे. इंद्रावती, मंजिरा, बिंदुसरा या गोदावरीच्या उपनद्या आहेत.

गोदावरी नदीतील पाणी ऋतुप्रमाणे कमी-अधिक असते. नदीतून वाहणाऱ्या पाण्यापैकी 80% पाणी जुलै-ऑक्टोबर या चार महिन्यांतच वाहून जाते. नदीच्या प्रवाहाची रुंदी काही ठिकाणी 200 मीटर (पूर्व घट पार करताना) तर काही ठिकाणी 6.5 कि.मी. (समुद्रास मिळण्याआधी) इतकी होते. गोदावरी नदीवर गंगापूर, नांदूर मधमेश्वर, डौलेश्र्वरम या ठिकाणी धरणे बांधली आहेत. या परिसरातील लोकांचे जीवन या नदीचे समृद्ध केले आहे. म्हणून गोदावरीस महाराष्ट्र व आंध्रप्रदेश राज्याची जीवनवाहिनी समजतात. गोदावरीचा त्रिभूज प्रदेश 5,100 चौरस किलोमीटरचा असून अत्यंत सुपीक समजला जातो.

नदी ही नैसर्गिक साधनसंपत्ती आहे. ती मानवाला बरेच काही देऊन जाते. परंतु मानव स्वर्थापोटी त्यात प्रदूषण करून त्याचा नाश करण्याचा प्रयत्न करतो.

या परिसराची माहिती दिल्याबद्दल मी व माझा मित्र परिवार तसेच शिक्षक या स्थानिक परिसरातील लोकांचे मन:पूर्वक आभारी आहोत.

आ) कारखान्यात भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा.

उत्तर :

एखाद्या ठिकाणी प्रत्यक्षात जाऊन तेथील भौगोलिक स्थिती जाणून घेणे, हा क्षेत्रभेटीचा प्रमुख हेतू असतो. आपल्या दैनंदिन वापरात असलेल्या बऱ्याच वस्तू या निसर्गनिर्मित नसतात. त्यावर विशिष्ट प्रक्रिया करून ती आपल्यापर्यंत येते. ती कशी तयार होते. हे जाणून घेण्यासाठी आमच्या वर्गाने शिक्षकांच्या मदतीने कारखान्याला भेट देण्याचे ठरविले. त्यासाठी पुढीलप्रमाणे प्रश्नावली तयार केली आहे.

i) ज्या कारखान्याला भेट द्यायची आहे. त्या कारखान्याचे नाव काय आहे ?

ii) या कारखान्यात कोणत्या वस्तूचे उत्पादन केले जाते ?

iii) कारखान्याचे स्थान व ठिकाण कोठे आहे ?

iv) तुमच्या परिसरापासून कारखाना किती अंतरावर आहे ?

v) कारखान्याचा परिसर किती क्षेत्रफळात आहे ?

vi) या कारखान्याच्या मालकाचे नाव काय आहे ?

vii) कारखान्यात एकूण किती कामगार काम करतात ?

viii) सकाळ पाळी, दुपार पाळी, रात्र पाळी अशा तीन विभागात कामगार वाटले गेले आहेत काय ?

ix) किती किती तासांची प्रत्येक भागाची पाळी असते ?

x) या कामगारांना ‘लेबर ॲक्ट’ लागू केला आहे की नाही ?

xi) जेवणाची सुट्टी किती तासानंतर दिली जाते ?

xii) तयार झालेला माल कोठे पाठविला जातो ?

xiii) कामगारांना आरोग्याशी संबंधित काही सुविधा दिल्या जातात का ?

xiv) महिला कामगार असल्यास काही विशेष सोयी आहेत काय ?

इ) क्षेत्रभेटीदरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन कसे कराल ?

उत्तर :

क्षेत्रभेटीदरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन पुढील प्रकारे करू :

i) क्षेत्रातील पडलेला कचरा संकलित करण्यासाठी मोठ्या आकाराच्या गोणी व पिशव्या बरोबर नेऊ.

ii) क्षेत्रभेटीदरम्यान क्षेत्रभेटीत सामील झालेल्या व्यक्तींकडून कचरा पसरणार नाही याची खबरदारी घेऊ. त्यासाठी क्षेत्रभेटीदरम्यान वापरलेल्या कागदी पिशव्या, ताटल्या, खाद्यपदार्थांची वेष्टने, उरलेले खाद्यपदार्थ इत्यादी एकत्र जमा करू.

iii) संबंधित क्षेत्रात माहिती फलक, पथनाट्ये, सूचना फलक इत्यादी साधनांद्वारे स्वच्छतेविषयी जाणीव-जागृती वाढवू.

iv) संबंधित क्षेत्रातील कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी संबंधित क्षेत्रातील शासकीय अधिकाऱ्यांशी शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार पत्राद्वारे/मुलाखतीद्वारे संपर्क साधू.

ई) क्षेत्रभेटीसाठी तुम्ही कोणते साहित्य घ्याल ?

उत्तर :

क्षेत्रभेटीसाठी आम्ही पुढील साहित्य घेऊ :

i) माहितीची नोंद करण्यासाठी नोंदवही, पेन, पेन्सिल, मोजपट्टी, कॅमेरा, दुर्बीण इत्यादी.

ii) स्थानाच्या दिशा निश्चितीसाठी होकायंत्र व सखोल अभ्यासासाठी नकाशे.

iii) क्षेत्रभेटीच्या हेतूनुसार माहिती संकलनासाठी नमुना प्रश्नावली.

iv) क्षेत्रातील पाण्याचे, मातीचे, कचऱ्याचे, वनस्पतींचे, दगडांचे नमुने गोळा करण्यासाठी कागदी पिशवी अथवा बंद झाकणाचे डबे. याशिवाय, टोपी, पाण्याची बाटली, प्रथमोपचार पेटी इत्यादी.

उ) क्षेत्रभेटीची आवश्यकता स्पष्ट करा.

उत्तर :

i) भूगोल विषयाद्वारे आपण विविध भुरूपे, हवामान, मृदा, वनस्पती, प्राणी, खनिजे इत्यादी नैसर्गिक घटकांची तसेच व्यवसाय, वाहतूक व संदेशवहन इत्यादी सांस्कृतिक घटकांचीही माहिती मिळवितो.

ii) एखाद्या स्थळाची किंवा प्रदेशाची माहिती पुस्तके व नकाशे यातून मिळविता येते; पण ती अप्रत्यक्षपणे मिळविलेली माहिती असते. एखाद्या क्षेत्रास भेट देऊन आपणास प्रत्यक्ष ज्ञान मिळते.

iii) नकाशात दाखविलेल्या प्रदेशाची आपण केवळ कल्पना करू शकतो. परंतु प्रत्यक्ष क्षेत्रभेटीतून तेथील वस्तुस्थिती समजते.

iv) क्षेत्रभेटीच्या वेळी आपण तेथील भौगोलिक परिस्थितीचे निरीक्षण करतो, तेव्हा आपल्या अनेक शंकांचे निरसन होते. क्षेत्रभेटीमुळे प्रत्यक्षात लोकांच्या विचारांची देवाण-घेवाण होते.

v) क्षेत्रभेटीमुळे पुस्तकात अभ्यासलेली माहिती अधिक चांगली समजते. त्यामुळे भूगोल विषयात क्षेत्रभेट आवश्यक असते.

Leave a Comment