राजकीय पक्ष स्वाध्याय इयत्ता दहावी राज्यशास्त्र
राजकीय पक्ष स्वाध्याय

1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
1) राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात, तेव्हा त्या संघटनांना ……………… म्हटले जाते.
अ) सरकार
ब) समाज
क) राजकीय पक्ष
ड) सामाजिक संस्था
उत्तर :
राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात, तेव्हा त्या संघटनांना राजकीय पक्ष म्हटले जाते.
2) नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष ……………….. येथे आहे.
अ) ओडिशा
ब) आसाम
क) बिहार
ड) जम्मू आणि काश्मीर
उत्तर :
नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष जम्मू आणि काश्मीर येथे आहे.
3) जस्टीस पार्टी या ब्राह्मणेतर चळवळीचे रुपांतर …………….. या राजकीय पक्षात झाले.
अ) आसाम गण परिषद
ब) शिवसेना
क) द्रविड मुनेत्र कळघम
ड) जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स
उत्तर :
जस्टीस पार्टी या ब्राह्मणेतर चळवळीचे रुपांतर द्रविड मुनेत्र कळघम या राजकीय पक्षात झाले.
2. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
1) राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात.
उत्तर :
हे विधान बरोबर आहे, कारण –
i) राजकीय पक्ष जनतेच्या मागण्या आणि गाऱ्हाणी शासनापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करतात.
ii) शासन पक्षांमार्फत आपल्या धोरणांची, योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवून त्यांचा या कार्यक्रमांना पाठिंबा मिळवतात.
iii) या धोरणांवरील जनतेच्या प्रतिक्रिया सरकारला सांगण्याचे कामही राजकीय पक्षच करतात.
अशा रितीने राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात.
2) राजकीय पक्ष या सामाजिक संघटनाच असतात.
उत्तर :
हे विधान बरोबर आहे कारण –
i) समाजातील काही व्यक्ती एकत्र येऊनच राजकीय पक्ष स्थापन करतात. म्हणजेच राजकीय पक्ष हे समाजाचेच अविभाज्य घटक असतात.
ii) जनतेच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष करीत असतात.
iii) त्या त्या समाजाची भूमिका, विचारसरणी घेऊन राजकीय पक्ष समाजात कार्य करीत असतात. म्हणून राजकीय पक्ष हे एक प्रकारे सामाजिक संघटनाच असतात.
3) आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते.
उत्तर :
हे विधान चूक आहे; कारण –
i) 1989 च्या निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने आघाडी सरकारे केंद्रात राज्यात अधिकारावर आली.
ii) पक्षांचा आपापला कार्यक्रम बाजूस ठेवून समान कार्यक्रमावर, भूमिकेवर एकत्र येऊन हे पक्ष सरकार चालवू लागले.
iii) 1977 चा जनता पक्षाचा प्रयोग फसल्यानंतर आता केंद्र व राज्य पातळीवर आघाडी शासन चांगल्या प्रकारे काम करीत आहेत. म्हणून आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते, हा समज खोटा ठरला आहे.
4) ‘शिरोमणी अकाली दल’ हा राष्ट्रीय पक्ष आहे.
उत्तर :
हे विधान चूक आहे; कारण –
i) भारतीय निवडणूक आयोग हा राजकीय पक्षांच्या मान्यतेचे निकष निश्चित करून, राष्ट्रीय वा प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता देत असतो.
ii) संसद आणि विधिमंडळात मिळवलेल्या जागा आणि निवडणुकीत मिळालेल्या मतांची टक्केवारी यांचा या अटीत समावेश असतो.
iii) शिरोमणी अकाली दल हा ‘राष्ट्रीय पक्ष’ म्हणून निश्चित केलेल्या अटीत बसत नाही. तो पंजाब राज्यापुरता मर्यादित व प्रभावी असल्याने या पक्षाला राष्ट्रीय नव्हे; तर प्रादेशिक पक्ष म्हणून आयोगाने मान्यता दिलेली आहे.
3. पुढील संकल्पना स्पष्ट करा.
1) प्रादेशिकता
उत्तर :
i) भारतात विविध भाषा बोलणारे विविध परंपरा आणि संस्कृती असणारे लोक राहतात.
ii) भौगोलिक विविधतेबरोबरच साहित्य, शिक्षण, इतिहास, चळवळी यांबाबतीतही भारतात विविधता आढळते.
iii) प्रत्येकालाच आपली भाषा, परंपरा, संस्कृती यांच्याविषयी आत्मीयता वाटते. या आत्मीयतेतूनच वरील सर्वाबाबत अस्मिता निर्माण होते.
iv) आपल्या भाषेच्या प्रदेशाच्या विकासाला लोक प्राधान्य देऊ लागतात. यालाच ‘प्रादेशिकता’ असे म्हणतात.
2) राष्ट्रीय पक्ष
उत्तर :
राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणाऱ्या पक्षांना ‘राष्ट्रीय पक्ष’ असे म्हणतात. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळविण्यासाठी निवडणूक आयोगाने पुढील निकष ठरवले आहेत.
i) किमान चार राज्यांमध्ये शेवटच्या लोकसभा निवडणुकीत किंवा विधानसभेच्या निवडणुकीत किमान 6 टक्के मते मिळणे आवश्यक किंवा किमान चार सभासद लोकसभेत निवडून येणे आवश्यक आहे. किंवा
ii) आधीच्या लोकसभेच्या निवडणुकीत किमान तीन राज्यांमध्ये मिळून लोकसभेच्या एकूण जागांपैकी 2 टक्के जागा निवडून येणे आवश्यक किंवा
iii) किमान चार राज्यांमध्ये राज्यपातळीवरील पक्ष म्हणून मान्यता मिळणे आवश्यक आहे.
4. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
1) राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
उत्तर :
राजकीय पक्षाची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे –
i) निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता प्राप्त करणे, हे राजकीय पक्षांचे मुख्य उद्दिष्ट असते.
ii) प्रत्येक राजकीय पक्षाची विशिष्ट विचारसरणी व धोरण असते. आपल्या विचारसरणीप्रमाणे प्रत्येक पक्ष आपल्या कार्यक्रमांची अंमलबजावणी करीत असतो.
iii) निवडणुकीत बहुमत मिळवणारा पक्ष सत्ताधारी बनतो तर अल्पमतातील पक्ष विरोधी पक्ष म्हणून कार्य करतात.
iv) राजकीय पक्ष सरकार व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करून पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतात.
2) भारतातील पक्षपद्धतीच्या स्वरूपात काय बदल झाला आहे.
उत्तर :
भारतातील पक्षपद्धतीच्या स्वरूपात पुढील बदल झाले –
i) स्वातंत्र्योत्तर काळात केंद्रात व राज्यांत काँग्रेस हा एकच प्रबळ पक्ष होता.
ii) 1977 साली सर्व महत्त्वाचे विरोधी पक्ष एकत्र येऊन त्यांनी काँग्रेसला आव्हान देऊन पराभूत केले. त्यामुळे एक प्रबळ पक्ष पद्धतीऐवजी द्विपक्ष पद्धतीला महत्त्व आले.
iii) 1989 च्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर एकाच पक्षाचे सरकार ही बाब संपुष्टात येऊन आघाडी सरकारे अधिकारावर आली.
iv) प्रादेशिक पक्षांना केंद्रात महत्त्व येऊन आघाडी सरकारे स्थिरावली.