जिल्हा प्रशासन स्वाध्याय
जिल्हा प्रशासन स्वाध्याय इयत्ता सहावी नागरिकशास्त्र

1. एका वाक्यात उत्तरे लिहा.
1) जिल्हा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो ?
उत्तर :
जिल्हा प्रशासनाचा प्रमुख जिल्हाधिकारी असतो.
2) तहसीलदारावर कोणती जबाबदारी असते ?
उत्तर :
तहसीलदारावर तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असते.
3) न्यायव्यवस्थेच्या शिरोभागी कोणते न्यायालय असते ?
उत्तर :
न्यायव्यवस्थेच्या शिरोभागी भारताचे सर्वोच्च न्यायालय असते.
4) कोणकोणत्या आपत्तींची पूर्वसूचना आपल्याला मिळू शकते ?
उत्तर :
पूर, वादळ यांसारख्या आपत्तींची पूर्वसूचना आपल्याला मिळू शकते.
2. जोड्या जुळवा.
अ गट | ब गट |
---|---|
अ) जिल्हाधिकारी | 1) तालुका दंडाधिकारी |
आ) जिल्हा न्यायालय | 2) कायदा व सुव्यवस्था राखणे |
इ) तहसीलदार | 3) तंटे सोडवणे |
उत्तर :
अ गट | ब गट |
---|---|
अ) जिल्हाधिकारी | 2) कायदा व सुव्यवस्था राखणे |
आ) जिल्हा न्यायालय | 3) तंटे सोडवणे |
इ) तहसीलदार | 1) तालुका दंडाधिकारी |
3. खालील मुद्द्यांवर चर्चा करा.
1) आपत्ती व्यवस्थापन
उत्तर :
i) आपत्तींचा सुव्यवस्थित व शास्त्रीय पद्धतीने सामना करण्याच्या पद्धतीला ‘आपत्ती व्यवस्थापन’ असे म्हणतात.
ii) आपत्ती व्यवस्थापनात संपूर्ण जिल्हा प्रशासन यंत्रणा गुंतलेली असते.
iii) तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे अनेक आपत्तींची आता पूर्वसूचना मिळू शकते. जसे पुराची, वादळाची पूर्वसूचना देणारी प्रणाली विकसित झाली आहे. या प्रणालीमुळे धोक्याची सूचना मिळते.
2) जिल्हाधिकाऱ्यांची कामे
उत्तर :
जिल्हाधिकाऱ्यांची कामे पुढीलप्रमाणे आहेत.
i) शेतसारा गोळा करणे. शेतीशी संबंधित कायद्यांची अंमलबजावणी करणे.
ii) दुष्काळ व चाऱ्याची कमतरता यांवर उपाययोजना करणे.
iii) जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखणे.
iv) सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवणे.
v) सभाबंदी, संचारबंदी जारी करणे.
vi) निवडणूक योग्य प्रकारे पार पाडणे.
vii) निवडणुकीच्या संदर्भात आवश्यक निर्णय घेणे.
viii) मतदार याद्या अद्ययावत करणे.
ix) आपत्तींच्या काळात त्वरित निर्णय घेऊन हानी रोखणे.
x) आपत्ती व्यवस्थानाच्या यंत्रणेला आदेश देणे.
xi) आपत्तीग्रस्तांचे पुनर्वसन करणे.
4. तुम्हांला यांपैकी कोण व्हावेसे वाटते व का ते सांगा.
1) जिल्हाधिकारी
2) जिल्हा पोलीस प्रमुख
3) न्यायाधीश
उत्तर :
मला जिल्हाधिकारी व्हावेसे वाटते. कारण जिल्हाधिकारी हा जिल्हा प्रशासनाचा प्रमुख असतो. तो शेतसारा गोळा करण्यापासून ते जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यापर्यंत अनेक कामे करतो. एक प्रकारे जिल्हाधिकारी समाजसेवा करतो.