भारत व अन्य देश स्वाध्याय इयत्ता नववी राज्यशास्त्र

1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
1) भारताशी आंतरराष्ट्रीय सरहद्द खुली असणारा देश –
अ) पाकिस्तान
ब) बांगलादेश
क) नेपाळ
ड) म्यानमार
उत्तर :
भारताशी आंतरराष्ट्रीय सरहद्द खुली असणारा देश – नेपाळ
2) भारताशी तणावपूर्ण संबंध असणारे देश –
अ) पाकिस्तान व चीन
ब) नेपाळ व भूटान
क) म्यानमार व मालदीव
ड) अफगाणिस्तान व अमेरिका
उत्तर :
भारताशी तणावपूर्ण संबंध असणारे देश – पाकिस्तान व चीन
3) भारत आणि पाकिस्तान या देशांच्या संबंधांवर प्रभाव असणाऱ्या बाबी –
अ) दोन्ही राष्ट्रांच्या जागतिक दृष्टिकोनातील फरक
ब) काश्मीर समस्या
क) अण्वस्त्रविषयक संघर्ष
ड) वरील सर्व समस्या
उत्तर :
भारत आणि पाकिस्तान या देशांच्या संबंधांवर प्रभाव असणाऱ्या बाबी – वरील सर्व समस्या
2. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
1) दक्षिण आशियायी राष्ट्रांमध्ये भारताचे स्थान महत्त्वाचे आहे.
उत्तर :
हे विधान बरोबर आहे.
कारण – i) भारतीय उपखंडात भारत हा आकाराने सर्वांत मोठा देश आहे.
ii) तसेच आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने देखील भारत अधिक विकसित आहे. त्यामुळे दक्षिण आशियायी राष्ट्रांमध्ये भारताचे स्थान महत्त्वाचे आहे.
2) भारत-चीन संबंध मैत्रीपूर्ण आहेत.
उत्तर :
हे विधान चूक आहे.
कारण – i) भारत आणि चीन यांच्यातील संघर्ष सीमाप्रश्न व तिबेटचा दर्जा या दोन प्रश्नांशी निगडित आहे.
ii) तसेच भारत आणि चीन यांच्यात सीमेवरून जो वाद आहे तो अँक्साई चीन आणि मॅकमोहन रेषा या क्षेत्रांशी संबंधित आहे. या सीमावादामुळे भारत-चीन संबंध फारसे मैत्रीपूर्ण नाहीत.
3) श्रीलंका सरकारच्या मदतीसाठी भारताने शांतिसेना पाठवली.
उत्तर :
हे विधान बरोबर आहे.
कारण – i) श्रीलंकेशी भारताचे संबंध मैत्रीपूर्ण आहेत.
ii) श्रीलंकेतील तमिळ लोक आणि श्रीलंकेचे सरकार यांच्यातील संघर्षामुळे 1985 नंतर श्रीलंकेत राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. त्यावेळी श्रीलंका सरकारच्या मदतीसाठी भारताने शांतिसेना पाठवली होती.
3. दिलेल्या सुचनेप्रमाणे कृती करा.
1. पुढील तक्ता पूर्ण करा.
| क्र. | झालेले करार/देवाणघेवाण | संबंधित देश |
|---|---|---|
| 1. | …………………… | भारत-पाकिस्तान |
| 2. | मॅकमोहन रेषा | …………………… |
| 3. | …………………… | भारत-बांगलादेश |
| 4. | नैसर्गिक वायूची आयात | …………………… |
| 5. | …………………… | भारत-अमेरिका |
| 6. | पायाभूत, क्षेत्रविकास, दळणवळण, आरोग्य | …………………… |
| 7. | …………………… | भारत-आफ्रिका |
उत्तर :
| क्र. | झालेले करार/देवाणघेवाण | संबंधित देश |
|---|---|---|
| 1. | ताश्कंद करार/सिमला करार | भारत-पाकिस्तान |
| 2. | मॅकमोहन रेषा | भारत-चीन |
| 3. | पाणीवाटपासंबंधी व सीमारेषेसंबंधी करार | भारत-बांगलादेश |
| 4. | नैसर्गिक वायूची आयात | भारत-म्यानमार |
| 5. | आण्विक सहकार्याचा करार | भारत-अमेरिका |
| 6. | पायाभूत, क्षेत्रविकास, दळणवळण, आरोग्य | भारत-मालदीव |
| 7. | शिक्षण, कौशल्य, आरोग्य, विज्ञान व तंत्रज्ञान, शेती, पर्यटन क्षेत्र | भारत-आफ्रिका |
4. पुढील संकल्पना स्पष्ट करा.
1) सिमला करार
उत्तर :
i) 1972 साली भारत-पाकिस्तान या दोन राष्ट्रांमध्ये सिमला हा करार झाला.
ii) सिमला करार हा दोन्ही राष्ट्रांत शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने टाकलेले महत्त्वाचे पाऊल होते. कारण यात दोन्ही देशांचा सन्मान कायम ठेवून शांती प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आला होता.
iii) त्यावेळी भारत विजयी राष्ट्र होते. सिमला करारानुसार भारत दबावाबाहेर परस्पर विचार विनिमयाने, वाटाघाटीने प्रश्न सोडवण्यावर भर देतो आणि स्थिर शांततेसाठी प्रयत्न करतो हे दिसून येते.
iv) या करारात व नंतरच्या काळातही भारताने पाकिस्तानबाबत उदारतेचे धोरण अवलंबले आहे. परंतु आजही पाकिस्तान सिमला कराराचे पालन करत नाही.
2) भारत-नेपाळ मैत्री करार
उत्तर :
i) भारत व नेपाळ यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांचा पाया 1950 साली भारत-नेपाळ मैत्री कराराने घातला गेला.
ii) या करारामुळे नेपाळमधील नागरिकांना भारतामध्ये सहज प्रवेशच नव्हे तर सरकारी नोकरी आणि उद्योग करायचा परवाना मिळाला आहे.
iii) पायाभूत सुविधा, अन्नविषयक गरजा आणि व्यापार यांसाठी आणि ऊर्जेसाठी नेपाळला भारताने मदत करावी असेही या मैत्री करारात ठरवण्यात आले.
3) मॅकमोहन रेषा
उत्तर :
i) मॅकमोहन रेषा ही आंतरराष्ट्रीय सीमारेषा आहे, हे चीन मान्य करत नाही.
ii) अक्साई चीन आणि मॅकमोहन रेषा यांच्या दक्षिणेकडील अरुणाचल प्रदेश हा चीनचाच भूभाग आहे असे चीनचे मत आहे.
iii) चीनला ही सीमारेषा मान्य नाही. यामुळे चीन व भारत यांच्यात वाद आहेत.
iii) हा सीमावाद संवादाच्या मार्गाने सुटावा म्हणून भारताने अनेक वेळा प्रयत्न केले. परंतु त्यास फारसे यश आले नाही. 1962 मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले.
4) भारत-अफगाणिस्तान संबंध
उत्तर :
i) अफगाणिस्तानामध्ये राजकीय अस्थिरता मोठ्या प्रमाणावर आहे. तालिबान या दहशतवादी संघटनेचे तेथील वर्चस्व हे त्याला कारणीभूत आहे.
ii) अफगाणिस्तानमध्ये शांतता, सुरक्षितता आणि स्थैर्य आणणे, तेथील हिंसाचाराला आळा घालणे, लोकशाही सरकार स्थापन करण्यास मदत करणे यासाठी भारताने अफगाणिस्तानला मदत देऊ केली आहे.
iii) तसेच युद्धामुळे नष्ट झालेल्या दळणवळणाच्या सुविधा निर्माण करणे, रस्तेबांधणी, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य, शाळा, आरोग्य सुविधा, सिंचन प्रकल्प यांची उभारणी अशा सर्वच क्षेत्रांत भारत अफगाणिस्तानला मदत करत आहे.
5. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
1) भारत अमेरिका यांच्यात सहकार्याचे संबंध निर्माण होण्यामागील पार्श्वभूमी विशद करा.
उत्तर :
भारत-अमेरिका यांच्यात सहकार्याचे संबंध निर्माण होण्यामागील –
i) भारत आणि अमेरिका ही लोकशाही व्यवस्था असलेली दोन राष्ट्रे आहेत. सुरुवातीपासूनच अमेरिका भारताचा सर्वांत महत्त्वाचा व्यापारी भागीदार होता.
ii) अनेक भारतीय शिक्षण आणि नोकरीच्या निमित्त्याने अमेरिकेत जात असल्याने अमेरिका आणि भारत यांच्यात सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक संबंध वाढत गेले आहे.
iii) शीतयुद्धानंतर भारत आणि अमेरिका यांच्यातील सुरक्षाविषयक संबंध मोठ्या प्रमाणावर वाढले. तसेच भारताने मुक्त अर्थव्यवस्थेचे धोरण स्वीकारल्यानंतर हळूहळू भारताचा आर्थिक प्रगतीचा वेग वधू लागला.
iv) त्याचप्रमाणे 2005 मध्ये झालेल्या संरक्षणविषयक सहकार्याचा करार आणि 2008 मध्ये झालेला आण्विक सहकार्याचा करार हे भारत-अमेरिका संबंधातील महत्त्वाचे टप्पे आहे. गेल्या 5 वर्षात आणि अमेरिका यांच्या दरम्यान सर्वच क्षेत्रांत सहकार्याचे संबंध निर्माण झाले आहेत.
2) शेजारच्या राष्ट्रांमध्ये लोकशाही प्रस्थापित होण्यासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांविषयी उदाहरणासह माहिती लिहा.
उत्तर :
i) अफगाणिस्तानमध्ये शांतता, सुरक्षितता आणि स्थैर्य आणणे, तेथील हिंसाचाराला आळा घालणे आणि लोकशाही सरकार स्थापन करण्यासाठी भारताने अफगाणिस्तानला मदत केली आहे.
ii) बांग्लादेश मुक्ती संग्रामात भारताने बांग्लादेशीयांना मदत केली. या राष्ट्रांमध्ये लोकशाही आहे.
iii) नेपाळमध्ये राजेशाही होती 1990 साली नेपाळची लोकशाहीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. यासाठी भारताने नेपाळशी मैत्री करार केला.
3) दक्षिण आशियायी प्रादेशिक सहकार्य संघटना कोणते कार्य करत आहे ?
उत्तर :
दक्षिण आशियायी प्रादेशिक सहकार्य संघटना पुढील कार्य करत आहे.
i) दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये आर्थिक सहकार्य निर्माण करणे व त्याद्वारे संपूर्ण दक्षिण आशियाचा विकास साधणे.
ii) दक्षिण आशियातील लोकांसाठी कल्याणकारी योजना आखून त्यांचे जीवनमान वाढवणे.
iii) दक्षिण आशियातील प्रदेशात आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उन्नती आणि विकासाची गती वाढवणे.
iv) परस्परांबद्दल विश्वास निर्माण करणेम परस्परांना समजून घेणे.
v) परस्परातील सहयोग गतिशील करून सांस्कृतिक, आर्थिक, औद्योगिक आणि वैज्ञानिक क्षेत्रातील सहयोग वाढवणे.
vi) समान उद्देश असलेल्या आंतरराष्ट्रीय संघटना आणि क्षेत्रीय संघटना यांच्याबरोबर सहकार्य करणे.
6. तुमचे मत लिहा.
1) भारत पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल ?
उत्तर :
भारत पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी पुढील उपाय सुचवता येईल.
i) भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी शांततामय मार्गाने आणि परस्पर वाटाघाटीतून आपले प्रश्न सोडवावेत.
ii) दोन देशांच्या दरम्यान दळण-वळणाची साधने उपलब्ध करावी. त्यातून आपापसांत विचारविनिमय करता येईल.
iii) दोन्ही देशांनी मिळून सांस्कृतिक आदान-प्रदानाचे कार्यक्रम करावे.
iv) कोणतेही वादग्रस्त प्रश्न उद्भवणार नाही असे कृत्य करणे टाळावे.
v) दहशतवादी संघटना नष्ट करण्याचा प्रयत्न करावा.
vi) दोन्ही देशांनी मिळून आंतकवाद या समस्येचे शांततामय मार्गाने निराकरण करावे.
vii) दोन्ही देशांनी आपापसातील सामाजिक सांस्कृतिक व आर्थिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करावा.
2) ‘भारताचे शेजारच्या राष्ट्रांशी तणावपूर्ण संबंध असल्याने अंतर्गत विकास साधण्यात अडथळे निर्माण होतात’ या विधानाशी तुम्ही सहमत आहात का ? सकारण स्पष्ट करा.
उत्तर :
‘भारताचे शेजारच्या राष्ट्रांशी तणावपूर्ण संबंध असल्याने अंतर्गत विकास साधण्यात अडथळे निर्माण होतात’ या विधानाशी मी सहमत आहे.
कारण – i) भारताच्या शेजारी असणाऱ्या राष्ट्राचे आपल्या राष्ट्राशी असणारे संबंध, त्या राष्ट्राची सैनिकी शक्ती, युद्धसाहित्य, शस्त्रास्त्रे या सर्वाचा प्रभाव अंतर्गत विकासात होतो.
ii) शेजारच्या राष्ट्रांशी तणावपूर्ण संबंध असल्याने कधीकधी युद्धाचे प्रसंग ओढवतात. त्यातून जीवित हानी व वित्तहानी निर्माण होते. त्यामुळे अंतर्गत विकास होऊन शकत नाही.
iii) सर्व देश कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी परस्परांवर अवलंबून असतात. जर त्यांमध्ये तणावपूर्ण संबंध असेल तर अंतर्गत विकास साधण्यात अडथळे निर्माण होतील. त्यातून देशाच्या सुरक्षेचा प्रश्न उद्भवेल. याकडे शासनाला अधिक लक्ष केंद्रिक करावे लागेल. आणि अंतर्गत विकास साधण्यात अडथळे निर्माण होईल.
3) भारताचे अमेरिकेशी असणारे दृढसंबंध भारताच्या आर्थिक विकासाला पोषक ठरतात असे तुम्हांस वाटते का ? सकारण स्पष्ट करा.
उत्तर :
भारताने अमेरिकेशी असणारे दृढसंबंध भारताच्या आर्थिक विकासाला पोषक ठरतात असे मला वाटते.
कारण – i) भारत आणि अमेरिका ही लोकशाही व्यवस्था असलेली दोन बलाढ्य राष्ट्रे आहेत.
ii) भारताने मुक्त अर्थव्यवस्थेचे धोरण स्वीकारल्यानंतर हळूहळू भारताचा आर्थिक प्रगतीचा वेग वाढू लागला आहे. त्याचा परिणाम भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी संबंध अधिक दृढ होण्यात झाला.
iii) भारतीय लोक शिक्षण नोकरी या निमित्ताने अमेरिकेत जात होते. तेथे लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. त्यामुळे भारताचा आर्थिक विकास होतो.