स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम पर्व स्वाध्याय इयत्ता आठवी

स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम पर्व स्वाध्याय

स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम पर्व स्वाध्याय इयत्ता आठवी

1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.

(अंदमान व निकोबार, ऑगस्ट क्रांती, विनोबा भावे)

1) वैयक्तिक सत्याग्रहाचे ……………… हे पहिले सत्याग्रही होते.

उत्तर :

वैयक्तिक सत्याग्रहाचे विनोबा भावे हे पहिले सत्याग्रही होते.

2) 1942 च्या राष्ट्रव्यापी आंदोलनाला ……………….. असे म्हटले जाते.

उत्तर :

1942 च्या राष्ट्रव्यापी आंदोलनाला ऑगस्ट क्रांती असे म्हटले जाते.

3) नोव्हेंबर 1943 मध्ये जपानने ……………… बेटे जिंकून ती आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली.

उत्तर :

नोव्हेंबर 1943 मध्ये जपानने अंदमान व निकोबार बेटे जिंकून ती आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली.

2. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

1) नोव्हेंबर 1939 मध्ये राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले.

उत्तर :

1939 मध्ये युरोपात दुसरे महायुद्ध सुरू झाले. तत्कालीन व्हॉईसरॉय लॉर्ड लिनलिथगो यांनी भारत इंग्लंडच्या बाजूने युद्धात सामील झाल्याची घोषणा केली. युरोपात लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आपण लढत असल्याचा दावा इंग्लंडने केला हा दावा खरा असेल, तर इंग्लंडने भारताला ताबडतोब स्वातंत्र्य द्यावे, अशी मागणी राष्ट्रीय सभेत केली. ही मागणी पूर्ण करण्यास इंग्लंडने नकार दिल्याने नोव्हेंबर 1939 मध्ये राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले.

2) आझाद हिंद सेनेला शस्त्रे खाली ठेवावी लागली.

उत्तर :

1943 मध्ये जपानने अंदमान व निकोबार बेटे जिंकून आझाद हिंद सरकारच्या ताब्यात दिले. 1944 मध्ये आझाद हिंद सेनेने म्यानमारमधील आराकानचा प्रदेश मिळवला. आसामच्या पूर्व सीमेवरील ठाणी जिंकली. याच काळात आझाद हिंद सेनेला जपानकडून मिळणारी मदत बंद झाल्याने इम्फाळची मोहीम अर्धवट राहिली. मात्र प्रतिकूल परिस्थितीतही आझाद हिंद सेनेचे सैनिक नेटाने लढत होते; परंतु याच काळात जपानने शरणागती पत्करली. 18 ऑगस्ट 1945 रोजी विमान अपघातात सुभाषचंद्र बोस यांचे निधन झाले. या पार्श्वभूमीवर आझाद हिंद सेनेला शस्त्रे खाली ठेवावी लागली.

3. प्रतिसरकार जनतेचे प्रेरणास्थान ठरले.

उत्तर :

महाराष्ट्रात निरनिराळ्या ठिकाणी प्रतिसरकार स्थापन केली. कर गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था टिकवणे, गुन्हेगारांना शासन करणे यांसारखी कामे प्रतिसरकारमार्फत केली जात. या सरकारमार्फत लोकन्यायालयाद्वारे केलेला न्यायनिवाडा लोक स्वीकारत असत. सावकारशाहीला विरोध, दारुबंदी, सारक्षरता प्रसार, जातिभेद निर्मूलन अशी अनेक विधायक कामे या सरकारने केली. त्यामुळे प्रतिसरकार जनतेचे प्रेरणास्थान ठरले.

3. पुढील तक्ता पूर्ण करा.

संघटना संस्थापक
1) फॉरवर्ड ब्लॉक
2) इंडियन इंडिपेंडन्स लीग
3) तुफान सेना

उत्तर :

संघटना संस्थापक
1) फॉरवर्ड ब्लॉक सुभाषचंद्र बोस
2) इंडियन इंडिपेंडन्स लीग रासबिहारी बोस
3) तुफान सेना बापू लाड

4. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

1) शिरीषकुमारचे कार्य तुम्हाला कसे प्रेरणादायी आहे ?

उत्तर :

शिरीषकुमार हा एक बालवीर. त्याने स्वातंत्र्य चळवळीमध्ये महत्त्वाचे योगदान दिले. शिरीषकुमारने तिरंगा हातात घेऊन नंदुरबार येथील शाळेतील विद्यार्थ्यासोबत मिरवणूक काढली. वंदेमातरमची घोषणा दिले. पोलिसांनी चिडून छोट्या मुलांवरही गोळीबार केला. या गोळीबारात शिरीषकुमार, लालदास, धनसुखलाल, शशिधर घनश्याम हे विद्यार्थी हुतात्मे झाले. शिरीषकुमार यांच्या कार्याने आम्हाला स्वातंत्र्यासाठी आपल्या जीवाचाही विचार न करता, देशाचा विचार प्रथम करावा ही शिकवण मिळाली. मी या देशाचा नागरिक आहे, हे जितके महत्त्वाचे तितकेच मी देशासाठी काय करतो हे विचारही महत्त्वाचे आहे.

2) इंग्लंडचे प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल यांनी स्टॅफर्ड क्रिप्स यांना भारतात का पाठवले ?

उत्तर :

दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडने जपानच्या विरोधात अमेरिकेचा पक्ष घेतला. जपानी फौजा भारताच्या पूर्व सीमेनजीक येऊन धडकल्या. जपानने भारतावर आक्रमण केल्यावर त्याला प्रतिकार करण्यासाठी भारतीयांचे सहकार्य मिळवणे इंग्लंडला आवश्यक वाटू लागले. म्हणून चर्चिल यांनी स्टॅफर्ड क्रिप्स यांना भारतात पाठवले.

3) राष्ट्रीय सभेच्या प्रमुख नेत्यांना अटक झाल्याचे वृत्त देशभर पसरल्यावर कोणती प्रतिक्रिया उमटली ?

उत्तर :

राष्ट्रीय सभेच्या प्रमुख नेत्यांना अटक झाल्याचे वृत्त देशभर पसरले. संतप्त जनतेने जागोजागी मिरवणुका काढल्या. पोलिसांनी जनतेवर लाठी हल्ले आणि गोळीबार केला, तरी लोक घाबरले नाहीत. काही ठिकाणी ब्रिटिश सरकारच्या दडपशाहीचे प्रतीक असणारे तुरंग, पोलिस ठाणी, रेल्वे स्थानके इत्यादी ठिकाणी आंदोलकांनी हल्ले केले. सरकारी कचेऱ्या ताब्यात घेण्याचे प्रयत्न केले. महाराष्ट्रात चिमूर, आष्टी, यावली, महाड, गारगोटी इ. अनेक गावांतून आबालवृद्धांनी नेटाने आणि असीम धैर्याने दिलेले लढे अविस्मरणीय ठरले.

Leave a Comment