भारतीय उपखंड आणि इतिहास स्वाध्याय
भारतीय उपखंड आणि इतिहास स्वाध्याय इयत्ता सहावी इतिहास

1. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.
1) इतिहास म्हणजे काय ?
उत्तर :
मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी म्हणजे इतिहास होय.
2) मानवी समाज दीर्घकाळ वस्ती कोठे करतो ?
उत्तर :
जिथे जगण्याच्या साधनांची मुबलकता असेल, तिथे मानवी समाज दीर्घकाळ वस्ती करतो.
3) डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी प्रामुख्याने कशावर अवलंबून रहावे लागते ?
उत्तर :
डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी प्रामुख्याने शिकारीवर आणि जंगलातून गोळा केलेल्या पदार्थांवर अधिक अवलंबून रहावे लागते.
4) भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती कोणती?
उत्तर :
भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी हडप्पा संस्कृती आहे.
2. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
1) मानवी समाजजीवन कोणत्या गोष्टींवर अवलंबून असते ?
उत्तर :
आहार, वेशभूषा, घरबांधणी, व्यवसाय इत्यादी गोष्टी बऱ्याच अशी मानवी समाज राहतो त्या परिसराच्या भौगोलिक वैशिष्ट्यांवर अवलंबून असतो. त्यावर मानवी समाजजीवन अवलंबून असते.
2) आपण राहतो त्या प्रदेशातील कोणत्या गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात ?
उत्तर :
आपण राहतो त्या प्रदेशातील हवामान, पर्जन्यमान, शेतीतून मिळणारे पीक, वनस्पती आणि प्राणी इत्यादी गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात.
3) ‘भारतीय उपखंड’ असे कोणत्या प्रदेशाला म्हणतात ?
उत्तर :
i) अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूटान, बांग्लादेश, श्रीलंका आणि आपला भारत देश मिळून तयार होणारा भूभाग ‘दक्षिण आशिया’ या नावाने ओळखला जातो.
ii) याच भूभागातील भारत देशाचा विस्तार आणि महत्त्व लक्षात घेऊन या प्रदेशाला ‘भारतीय उपखंड’ असे म्हणतात.
3. कारणे लिहा.
1) इतिहास आणि भूगोल यांचे नाते अतूट असते.
उत्तर :
कारण – i) स्थल, काल, व्यक्ती व समाज हे इतिहासाचे चार प्रमुख आधारस्तंभ आहेत.
ii) या चार घटकांशिवाय इतिहास लिहिला जाऊ शकत नाही.
iii) यापैकी स्थल हा घटक भूगोलाशी म्हणजे भौगोलिक परिस्थितीशी संबंधित आहे. भौगोलिक परिस्थिती इतिहासावर अनेक प्रकारे परिणाम करत असते. म्हणून इतिहास आणि भूगोल यांचे नाते अतूट असते.
2) लोकांना गाव सोडून जाणे भाग पडते.
उत्तर :
कारण – i) जिथे जगण्याच्या साधनांची मुबलकता असेल, तिथे मानवी समाज दीर्घकाळ वस्ती करतो.
ii) कालांततांने या वस्त्यांचे ग्राम-वसाहती आणि नगरे यांत रुपांतर होते.
iii) पर्यावरणाचा ऱ्हास, दुष्काळ, आक्रमणे आणि इतर कारणांमुळे जगण्याच्या साधनांची कमतरता भासू लागते. त्यामुळे लोकांना गाव सोडून जाणे भाग पडते.
4. डोंगराळ प्रदेश व मैदानी प्रदेश यांच्या लोकजीवनातील फरक स्पष्ट करा.
उत्तर :
डोंगराळ प्रदेशातील लोकजीवन | मैदानी प्रदेशातील लोकजीवन |
---|---|
i) डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे जीवन मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांपेक्षा अधिक कष्टाचे असते. ii) डोंगराळ प्रदेशात सुपीक शेतजमिनीची उपलब्धता कमी असते. iii) डोंगराळ प्रदेशातील लोकांना तृणधान्ये आणि भाज्या कमी प्रमाणात उपलब्ध असतात. iv) डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी शिकारीवर आणि जंगलातून गोळा केलेल्या पदार्थांवर अधिक अवलंबून राहावे लागते. | i) डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या मानाने मैदानी प्रदेशातील लोकांचे जीवन कमी कष्टाचे असते. ii) मैदानी प्रदेशात सुपीक शेतजमिनीची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर असते. iii) त्या तुलनेने मैदानी प्रदेशातील लोकांना तृणधान्ये आणि भाज्या मुबलक प्रमाणात मिळतात. iv) मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी शेतीवर अवलंबून राहावे लागते. |
5. पाठ्यपुस्तकातील भारत-प्राकृतिक या नकाशाचे निरीक्षण करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा.

1) भारताच्या उत्तरेकडे कोणत्या पर्वतरांगा आहेत ?
उत्तर :
भारताच्या उत्तरेकडे हिमालय पर्वतरांगा आहेत.
2) भारताच्या उत्तरेकडून येणारे मार्ग कोणते ?
उत्तर :
भारताच्या उत्तरेकडून येणारे खुश्कीचे मार्ग व रेशीम मार्ग आहेत.
3) गंगा-ब्रह्मपुत्रा या नद्यांचा संगम कोठे होतो ?
उत्तर :
गंगा-ब्रह्मपुत्रा नद्यांचा संगम बांग्लादेशमध्ये होतो.
4) भारताच्या पूर्वेस कोणती बेटे आहेत ?
उत्तर :
भारताच्या पूर्वेस अंदमान आणि निकोबार बेटे आहेत.
5) थरचे वाळवंट भारताच्या कोणत्या दिशेला आहे ?
उत्तर :
थरचे वाळवंट भारताच्या पश्चिम दिशेला आहे.