प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह स्वाध्याय

प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह स्वाध्याय

प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह स्वाध्याय इयत्ता सहावी इतिहास

१. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

१) जैन धर्मात ……………… या तत्त्वाला महत्त्व दिलेले आहे.

उत्तर :

जैन धर्मात अहिंसा या तत्त्वाला महत्त्व दिलेले आहे.

२) सर्व प्राणिमात्रांविषयीची ………………… हे गौतम बुद्धांच्या व्यक्तिमत्त्वाचे असाधारण वैशिष्ट्य होते.

उत्तर :

सर्व प्राणिमात्रांविषयीची करुणा हे गौतम बुद्धांच्या व्यक्तिमत्त्वाचे असाधारण वैशिष्ट्य होते.

२. थोडक्यात उत्तरे लिहा.

१) वर्धमान महावीरांनी कोणती शिकवण दिली ?

उत्तर :

मानुष्याचा मोठेपणा त्याच्या वर्णावर अवलंबून नसून त्याच्या उत्तम चारित्र्यावर अवलंबून असतो, अशी वर्धमान महावीरांनी शिकवण दिली.

२) गौतम बुद्धांचे कोणते वचन विख्यात आहे, त्यातून कोणती मूल्ये प्रकट होतात ?

उत्तर :

i) गौतम बुद्धांनी मानवी बुद्धीच्या स्वातंत्र्याची घोषणा केली.

ii) जन्माने कोणी श्रेष्ठ वा कनिष्ठ ठरत नाही, तर आचरणावरूनच श्रेष्ठ कनिष्ठता ठरते.

iii) ‘छोटीशी चिमणीदेखील आपल्या घरट्यात स्वच्छंदपणाने चिवचिवते’ हे गौतम बुद्धांचे वचन विख्यात आहे.

३) ज्यू धर्माच्या शिकवणीत कोणत्या गुणांवर भर दिलेला आहे ?

उत्तर :

ज्यू धर्माच्या शिकवणीत न्याय, शांती, प्रेम, करुणा, विनम्रता, दान करणे, चांगले बोलणे आणि स्वाभिमान या गुणांवर भर दिलेला आहे.

४) ख्रिश्चन धर्मामध्ये काय सांगितले आहे ?

उत्तर :

i) ख्रिश्चन धर्मामध्ये देव एकच आहे. तो सर्वाचा प्रेमळ पिता आहे आणि सर्वशक्तिमान आहे.

ii) येथू ख्रिस्त हे देवाचे पुत्र असून मानवजातीच्या उद्धारासाठी पृथ्वीवर आलेले होते. असे मानले जाते.

iii) आपण सारे एकमेकांचे बंधुभगिनी आहोत. आपण सर्वावर प्रेम केले पाहिजे, अगदी शत्रूवर देखील चुकलेल्यांना क्षमा केली पाहिजे, असे ख्रिश्चन धर्मामध्ये सांगितले आहे.

५) इस्लाम धर्माची शिकवण काय सांगते ?

उत्तर :

i) इस्लाम धर्मात सर्वकाळी आणि सर्वत्र फक्त अल्लाह आहे, तो सर्वशक्तिमान आणि परम दयाळू आहे, असे इस्लाममध्ये सांगितले आहे.

ii) मानवी अस्तित्वाचा हेतू अल्लाहची उपासना करणे हाच आहे, असे मानलेले आहे.

iii) मनुष्याने आयुष्यात कसे वागावे, याची इस्लाम धर्मात शिकवण दिली आहे.

६) पारशी विचारसरणीचा गाभा कोणता आहे ?

उत्तर :

उत्तम विचार, उत्तम वाणी आणि उत्तम कृती ही तीन प्रमुख आचरणतत्त्वे पारशी विचारसरणीचा गाभा आहे.

३. टिपा लिहा.

१) आर्यसत्ये

मानवी जीवनातील सर्व व्यवहारांच्या मुळाशी चार सत्ये आहेत. त्यांना आर्यसत्ये म्हटलेले आहे. ते पुढीलप्रमाणे आहेत.

i) दु:ख – मानवी जीवनात दु:ख असते.

ii) दु:खाचे कारण – दु:खाला कारण असते.

iii) दु:ख-निवारण – दु:ख दूर करता येते.

iv) प्रतिपद – प्रतिपद म्हणजे मार्ग. हा दु:खाचा अंत करण्याचा मार्ग आहे. हा मार्ग शुद्ध आचरणाचा आहे. या मार्गाला ‘अष्टांगिक मार्ग’ असे म्हटले आहे.

२) पंचशील

उत्तर :

गौतम बुद्धांनी पाच नियमांचे पालन करण्यास सांगतले. त्या नियमांनाच ‘पंचशील’ असे म्हणतात.

i) प्राण्यांची हत्या करण्यापासून दूर राहणे.

ii) चोरी करण्यापासून दूर राहणे.

iii) अनैतिक आचरणापासून दूर राहणे.

iv) असत्य बोलण्यापासून दूर राहणे.

v) मादक पदार्थाच्या सेवनापासून दूर राहणे.

४. खालील दिलेल्या पंचमहाव्रते आणि त्रिरत्ने यांचे तक्त्यात वर्गीकरण करून लिहा.

१) अहिंसा

२) सम्यक् दर्शन

3) सत्य

४) अस्तेय

५) सम्यक् ज्ञान

६) अपरिग्रह

७) सम्यक् चारित्र्य

८) ब्रह्मचर्य

उत्तर :

पंचमहाव्रते त्रिरत्ने
१) अहिंसा
२) सत्य
३) अस्तेय
४) अपरिग्रह
५) ब्रह्मचर्य
१) सम्यक् दर्शन
२) सम्यक् ज्ञान
३) सम्यक् चारित्र्य

५. कारणे लिहा.

१) वर्धमान महावीरांना ‘जिन’ का म्हणू लागले ?

उत्तर :

कारण – शरीराला सुखाकारक वाटणाऱ्या गोष्टींनी होणारा आनंद आणि त्रासदायक गोष्टींनी होणारी पीडा, यांचा स्वत:वर काहीही परिणाम होऊ न देणे, म्हणजे विकरांवर विजय मिळवणे. असा विजय वर्धमान महावीरांनी मिळवला, म्हणजे त्यांना ‘जिन’ म्हणू लागले.

२) गौतम बुद्धांना ‘बुद्ध’ असे का म्हटले गेले ?

उत्तर :

कारण – गौतम बुद्धांना मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले होते, म्हणून त्यांना ‘बुद्ध’ असे म्हटले गेले.

Leave a Comment