संविधानाची उद्देशिका स्वाध्याय

संविधानाची उद्देशिका स्वाध्याय

संविधानाची उद्देशिका स्वाध्याय इयत्ता सातवी

संविधानाची उद्देशिका स्वाध्याय इयत्ता सातवी नागरिकशास्त्र

प्रश्न. 1. शोधा आणि लिहा. 

उत्तर :

 

1) देशातील सर्व नागरिकांविषयी आणि परस्परांविषयी आत्मीयतेची भावना असणे. 

उत्तर :

बंधुभाव

2) राज्यकारभाराची सत्ता लोकांच्या हाती असणे. 

उत्तर :

लोकशाही

3) उद्देशिकेलाच म्हटले जाते. 

उत्तर :

सरनामा

4) सर्व धर्माना समान मानणे. 

उत्तर :

धर्मनिरपेक्ष

प्रश्न. 2. लिहिते होऊया. 

1) धर्मनिरपेक्ष राज्यात कोणत्या तरतुदी असतात ?

उत्तर :

धर्मनिरपेक्ष राज्यात पुढील तरतुदी असतात.

i) कोणत्याही एकाच धर्माला राज्याचा धर्म मानला जात नाही.

ii) नागरिकांना आपापल्या धर्माचे पालन करण्याची मुभा असते.

iii) नागरिकांमध्ये धर्माच्या आधारावर भेदभाव करता येत नाही.

2) प्रौढ मतदान पद्धती म्हणजे काय ?

उत्तर :

वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या सर्व नागरिकांच्या मत देण्याच्या अधिकाराला प्रौढ मतदान पद्धती असे म्हणतात.

3) आर्थिक न्यायामुळे नागरिकांना कोणते हक्क मिळतात ?

उत्तर :

i) भूक, उपासमार, कुपोषण या बाबी गरिबीमुळे किंवा दारिद्र्यामुळे निर्माण होतात.

ii) गरिबी दूर करायची असेल तर प्रत्येकाला आपले व कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी उपजीविकेचे साधन मिळवण्याचा हक्क आहे. आपल्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला हा अधिकार कोणत्याही भेदभावाशिवाय दिला आहे. हे हक्क नागरिकांना आर्थिक न्यायामुळे मिळतात.

4) समाजात व्यक्तिप्रतिष्ठा कशी निर्माण होईल ?

उत्तर :

जेव्हा प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा आदर करून तिच्या स्वातंत्र्य व हक्काचा सन्मान करेल तेव्हा आपोआप समाजात व्यक्तिप्रतिष्ठा निर्माण होईल.

प्रश्न. 3. आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा उपयोग आपण कशाप्रकारे केला पाहिजे, तुमचे मत लिहा/सांगा. 

उत्तर :

i) प्रत्येकाला आपले मत व विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य असले तरी आपले मत व विचार कोणावरही लादू नये.

ii) आपल्याला सण-उत्सव साजरे करण्याचे, श्रद्धास्थाने बाळगण्याचे व उपासनेचे स्वातंत्र्य असले तरी हे सण-उत्सव साजरे करताना काही नियम पाळावे लागतात. त्यामुळे आपल्या स्वातंत्र्यावर बंधन येत नाही.

iii) आपल्याला स्वातंत्र्य असले तरी मनाला येईल तसे न वागता सर्वानी जबाबदारीने वागावे.

iv) संविधानाने आपल्याला अनेक हक्क दिलेले आहेत, परंतु त्यांचा बेजबाबदारपणे वापर करता येत नाही. अशा वागण्यामुळे इतरांचे नुकसान होणार नाही याचे भान आपण ठेवले पाहिजे. आपल्याला बोलण्याचे, भाषणाचे स्वातंत्र्य आहे, परंतु चिथावणी देणारे लिखाण किंवा भाषण करता येत नाही.

प्रश्न. 4. संकल्पना स्पष्ट करा. 

1) समाजवादी राज्य –

उत्तर :

ज्या राज्यामध्ये गरीब-श्रीमंत यांच्यात मोठी दरी नसते. देशाच्या संपत्तीवर सर्वाचा हक्क असतो. तसेच संपत्तीचे केंद्रीकरण काही लोकांच्याच हाती होणार नाही याची काळजी घेतली जाते. त्यांना समाजवादी राज्य म्हणतात.

2) समता – 

उत्तर :

जात, धर्म, वंश, लिंग, जन्मस्थान इत्यादींवर आधारित भेदभाव न करता माणूस म्हणून सर्वाचा दर्जा समान असेल तसेच उच्च-नीच, श्रेष्ठ-कनिष्ठ असे भेद न करणे म्हणजे समता होय.

3) सार्वभौम राज्य –

उत्तर :

ज्या राज्यात योग्य वाटतील असे निर्णय घेण्यास स्वातंत्र्य असेल. तसेच एखादे राज्य परकीय नियंत्रणाखाली नसते. अशा राज्याला सार्वभौम राज्य असे म्हणतात.

4) संधीची समानता – 

उत्तर :

आपल्या विकासाच्या संधी सर्वाना प्राप्त होतील, त्या उपलब्ध करून देताना कोणताही भेदभाव केला जाणार नभाही. त्याला ‘संधीची समानता’ असे म्हणतात.

प्रश्न. 5. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत कोणकोणत्या महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख केला आहे ?

उत्तर :

भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत पुढील महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख केला आहे.

i) सार्वभौम राज्य – 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र्य झाला. त्यावेळी भारताला सार्वभौमत्व प्राप्त झाले. आपण आपल्या देशात योग्य वाटतील असे निर्णय घेण्यास स्वतंत्र्य आहोत. एखादे राज्य परकीय नियंत्रणाखाली नसणे. म्हणजे सार्वभौम राज्य होय. सार्वभौमत्व म्हणजे राज्यकारभार करण्याचा सर्वश्रेष्ठ अधिकार होय. लोकशाहीत सार्वभौमत्व हे जनतेच्या हाती असते. जनता आपले प्रतिनिधी निवडून देऊन त्यांना त्यांचे सार्वभौम अधिकार वापरण्याची परवानगी देते.

ii) समाजवादी राज्य – ज्या राज्यामध्ये गरीब-श्रीमंत यांच्यात मोठी दरी नसते. देशाच्या संपत्तीवर सर्वाचा हक्क असतो. तसेच संपत्तीचे केंद्रीकरण काही लोकांच्याच हाती होणार नाही याची काळजी घेतली जाते. त्यांना समाजवादी राज्य म्हणतात.

iii) धर्मनिरपेक्ष राज्य – भारतीय संविधानाच्या उद्देशिकेने धर्मनिरपेक्षता हे आपले उद्दिष्ट असल्याचे सांगितले आहे. कोणत्याही एका धर्माला राज्याचा धर्म मानला जात नाही. नागरिकांना आपापल्या धर्माचे पालन करण्याची मुभा असते. नागरिकांमध्ये धर्माच्या आधारावर भेदभाव करता येत नाही.

iv) लोकशाही राज्य – लोकशाही राज्यात राज्यकारभाराची सत्ता लोकांच्या हाती असते. त्यांच्या इच्छेनुसार सरकार निर्णय घेते आणि धोरणे आखते. त्यासाठी निवडणूक घेण्यात येते. या निवडणुकांमध्ये मतदार मत देऊन आपले प्रतिनिधी निवडतात. निवडून आलेले प्रतिनिधी संविधानाने निर्माण केलेल्या संसद, कार्यकारी मंडळ अशा संस्थांमध्ये जातात. संविधानाने नमूद केलेल्या किंवा सांगितलेल्या प्रक्रियेने संपूर्ण जनतेसाठी निर्णय घेतात.

v) गणराज्य – गणराज्यात सर्व सार्वजनिक पदे लोकांकडून निवडून दिली जातात. कोणतेही सार्वजनिक पद वंशपरंपरेने येत नाहीत. जसे राष्ट्रपती, प्रधानमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री, महापौर, सरपंच यांसारखी पदे सार्वजनिक असतात. त्या पदांवर विशिष्ट वयाची अट पूर्ण करणाऱ्या कोणत्याही भारतीय नागरिकाला निवडणूक लढवून जाता येते. राजसत्ताक पद्धतीत ही पदे वंशपंरपरेने एकाच कुटुंबातील व्यक्तींकडे जातात.

याशिवाय उद्देशिकेत सर्व भारतीय नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य व समता या तीन मूल्यांची व त्यानुसार व्यवहार करण्याची, कायदे करून ती मूल्ये प्रत्यक्ष व्यवहारात आणण्याची हमी दिली आहे.

Leave a Comment